मुक्ताईनगर (प्रतिनिधी):गेल्या दशकभरापासून आपल्या न्याय्य हक्कासाठी लढा देणाऱ्या ८१ लाख ईपीएस ९५ पेन्शनधारकांनी आता निर्णायक संघर्षाची तयारी केली आहे. नॅशनल अजिटेशन कमिटीचे (NAC) राष्ट्रीय अध्यक्ष कमांडर अशोक राऊत यांच्या नेतृत्वाखाली येत्या ९, १० आणि ११ मार्च २०२६ रोजी दिल्लीतील जंतर-मंतर मैदानावर ‘आता आश्वासन नको, तर प्रत्यक्ष न्याय हवा’ या भूमिकेतून ‘करो या मरो’ आंदोलन पुकारण्यात आले आहे.
या संदर्भात केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री तथा खासदार ना. रक्षाताई खडसे यांना निवेदनाद्वारे साकडे घालण्यात आले.
बुलढाण्यात ७ वर्षांपासून साखळी उपोषण सुरू
संघटनेचे मुख्यालय असलेल्या बुलढाणा येथे गेल्या २६२० दिवसांपासून (७ वर्षांहून अधिक काळ) साखळी उपोषण अविरत सुरू आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन आणि श्रममंत्री मनसुखभाई मांडविया यांनी बैठकांमध्ये मागण्या मान्य करण्याचे आश्वासन दिले होते, मात्र अद्याप प्रत्यक्ष निर्णयाची अंमलबजावणी झालेली नाही. त्यामुळे पेन्शनधारकांमध्ये तीव्र असंतोष पसरला असून, आता दिल्लीत शक्तीप्रदर्शन केले जाणार आहे.प्रमुख मागण्या:किमान ७,५०० रुपये पेन्शनसह महागाई भत्ता (DA) लागू करावा.पती-पत्नी दोघांनाही मोफत आरोग्य सुविधा मिळावी.अन्य प्रलंबित मागण्यांना त्वरित मंजुरी मिळावी.
रक्षाताई खडसे यांचे सकारात्मक आश्वासन
मुक्ताईनगर येथे NAC महाराष्ट्र प्रदेश उपसचिव एच. एन. व्यवहारे आणि बुलढाणा जिल्हाध्यक्ष पी. एन. मिरगे यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने ना. रक्षाताई खडसे यांची भेट घेतली. यावेळी नामदार खडसे यांनी, “वृद्ध पेन्शनर्सच्या न्याय हक्कासाठी आणि पेन्शनवाढीसाठी केंद्र सरकार दरबारी आवश्यक ते सर्व प्रयत्न जरूर केले जातील,” असे आश्वासित केले.
‘आत्ता नाही तर कधीच नाही’ – कार्यकर्त्यांचा निर्धार
मुक्ताईनगर येथील सभेत पदाधिकारी एच. एन. व्यवहारे, पी. एन. मिरगे आणि संतोषराव पाटील यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. “जोर जुल्म के टक्कर में, संघर्ष हमारा जारी है” अशा घोषणा देत, दिल्ली आंदोलनासाठी जास्तीत जास्त सदस्यांनी रेल्वे आरक्षण करावे, असे आवाहन करण्यात आले. जे वृद्ध सभासद प्रकृती अभावी येऊ शकत नाहीत, त्यांनी आंदोलनासाठी निधी जमा करून सहकार्य करावे, अशी विनंतीही यावेळी करण्यात आली.उपस्थित मान्यवरया प्रसंगी संतोषराव पाटील, सुरेशराव चौधरी, बी. बी. पवार, एम. ई. फिरके, एम. डी. देशपांडे, मधुकर श्रीखंडे, एस. जी. देशमुख यांच्यासह मलकापूर, जामनेर, भुसावळ आणि मुक्ताईनगर येथील असंख्य सभासद उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन ए. के. राऊत (सहसचिव NAC, बुलढाणा) यांनी केले, तर आभार प्रदर्शन सुधाकरराव खेडकर (सहसचिव, मुक्ताईनगर) यांनी मानले.
”केवळ आश्वासनांना बळी न पडता, जोपर्यंत प्रत्यक्ष शासन निर्णय होत नाही, तोपर्यंत आमचा लढा सुरूच राहील. देशाला घडवणारा वृद्ध आज हताश नसून संघर्षासाठी सज्ज आहे!”— NAC पदाधिकारी










