जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयाची सुवर्णभरारी; ई-गव्हर्नन्समध्ये राज्यात प्रथम क्रमांक!
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते जिल्हाधिकारी रोहन घुगे यांचा गौरव; पारदर्शक आणि गतिमान प्रशासनावर शिक्कामोर्तब
जळगाव | महाराष्ट्र राज्याचे प्रशासन अधिक लोकाभिमुख, गतिमान आणि पारदर्शक करण्यासाठी मुख्यमंत्री यांच्या संकल्पनेतून राबविण्यात आलेल्या ‘१५० दिवसांच्या ई-गव्हर्नन्स सुधारणा’ कार्यक्रमात जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयाने ऐतिहासिक कामगिरी बजावली आहे. संपूर्ण राज्यात जळगाव जिल्ह्याने प्रथम क्रमांक पटकावला असून, आज मुंबई येथील सहयाद्री अतिथीगृह येथे आयोजित विशेष सोहळ्यात जिल्ह्याचा गौरव करण्यात आला.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते जळगावचे जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी हा सन्मान स्वीकारला. यावेळी माहिती तंत्रज्ञान मंत्री आशिष शेलार, राज्याचे मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
२०० पैकी १८८ गुणांसह अव्वल स्थान
भारतीय गुणवत्ता परिषद (Quality Council of India – QCI) मार्फत राज्यातील सर्व शासकीय कार्यालयांचे सात सर्वसमावेशक निकषांवर मूल्यमापन करण्यात आले होते. या कडक निकषांच्या कसोटीवर उतरत जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयाने २०० पैकी तब्बल १८८ गुण मिळवून महाराष्ट्रात अव्वल येण्याचा मान मिळवला आहे.
डिजिटल क्रांतीची यशस्वी अंमलबजावणी
प्रशासनात आमूलाग्र बदल घडवून आणण्यासाठी जळगाव प्रशासनाने आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर केला आहे. यात प्रामुख्याने खालील बाबींचा समावेश राहिला:
ई-ऑफिस प्रणाली:
कार्यालयातील कामकाज १०० टक्के कागदविरहित (Paperless) करण्यात आले आहे.
AI चा वापर:
शासकीय गोदामातील धान्य साठ्याचे रिअल-टाइम निरीक्षण आणि स्वयंचलित मोजणीसाठी कृत्रिम बुद्धिमत्तेचा (AI) वापर करणारा जळगाव हा अग्रणी जिल्हा ठरला आहे.
सेतूदूत चॅटबॉट:
नागरिकांना २४x७ अर्ज स्थिती आणि तक्रार नोंदणीसाठी व्हॉट्सअॅप चॅटबॉट सेवा उपलब्ध करून दिली आहे.
GIS मॅपिंग:
आरोग्य, शिक्षण आणि जलस्रोतांचे अचूक नियोजन करण्यासाठी जीआयएस तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे.
“हे यश जळगाव जिल्हा प्रशासनातील सर्व अधिकारी आणि कर्मचारी यांच्या सांघिक प्रयत्नांचे फळ आहे. आम्ही तंत्रज्ञानाच्या माध्यमातून सामान्य नागरिकांपर्यंत सेवा पोहचवण्यासाठी कटिबद्ध आहोत. हे यश समस्त जळगावकरांना समर्पित आहे.”
— रोहन घुगे, जिल्हाधिकारी, जळगाव.
नागरिकांसाठी काय बदलले?
जिल्हाधिकारी कार्यालयाचे अधिकृत संकेतस्थळ (jalgaon.gov.in) आता पूर्णतः मोबाईल फ्रेंडली झाले असून, ‘आपले सरकार’ पोर्टलच्या माध्यमातून १९ महत्त्वाच्या सेवा ऑनलाईन उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. यामुळे नागरिकांना आता शासकीय कामासाठी कार्यालयात चकरा मारण्याची गरज उरलेली नाही.








