राज्यात लॉकडाऊन नाहीच; अफवा पसरवणाऱ्यांवर होणार फौजदारी कारवाई!
इंधन साठ्याबाबत अफवांवर विश्वास न ठेवण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे आवाहन
मुंबई: इराण-इस्रायल युद्धाच्या पार्श्वभूमीवर देशात लॉकडाऊन लागणार आणि इंधन टंचाई निर्माण होणार, अशा चर्चांनी सध्या समाजमाध्यमांवर जोर धरला आहे. मात्र, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या सर्व चर्चा फेटाळून लावल्या असून “राज्यात कोणताही लॉकडाऊन लागणार नाही,” असे स्पष्ट केले आहे. अफवा पसरवणाऱ्यांविरुद्ध कडक फौजदारी कारवाईचा इशाराही त्यांनी दिला आहे.
महिन्याभराचा इंधन साठा उपलब्ध
युद्धजन्य परिस्थितीमुळे पेट्रोल पंपांवर नागरिकांनी रांगा लावल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. यावर मुख्यमंत्री म्हणाले, “नागरिकांनी घाबरून जाण्याचे कारण नाही. आपल्याकडे पुढील एक महिन्याचा पुरेशा पेट्रोल आणि डिझेलचा साठा उपलब्ध आहे. विनाकारण साठवणूक केल्यास पुरवठा साखळीवर ताण येतो, त्यामुळे नेहमीप्रमाणेच इंधन खरेदी करावे. कृत्रिम टंचाई निर्माण होईल असे कृत्य करू नका.”
सामान्यांच्या खिशाला झळ नाही
कच्च्या तेलाच्या किमती वाढल्या असल्या तरी केंद्र सरकारने एक्साईज ड्युटीमध्ये १० रुपयांची कपात केली आहे. त्यामुळे वाढीव दराचा बोजा तेल कंपन्या आणि सरकार सोसेल, सर्वसामान्यांना महागड्या दराने इंधन घ्यावे लागणार नाही, असा दिलासा मुख्यमंत्र्यांनी दिला. शेजारील देशांमध्ये शटडाऊनची स्थिती असताना भारताने उत्तम नियोजनामुळे परिस्थिती नियंत्रणात ठेवली असल्याचेही त्यांनी नमूद केले.
सोशल मीडियावरील ‘पोस्ट’वर लक्ष
”लॉकडाउन लागणार ही पूर्णपणे खोटी माहिती आहे. फेसबुक, एक्स (ट्विटर) किंवा व्हॉट्सॲपवर अशा अफवा पसरवणे आता गुन्हा ठरेल. जे कोणी जाणीवपूर्वक भीतीचे वातावरण निर्माण करतील, त्यांच्यावर पोलीस प्रशासन कठोर कारवाई करेल,” असा दमच मुख्यमंत्र्यांनी दिला आहे.











