होम मुक्ताई दूत जळगाव देश – विदेश महाराष्ट्र राजकीय खेळ व्हायरल लाइफस्टाइल मनोरंजन
Breaking

आखाजीची ती ‘गोल्डन’ परंपरा: जेव्हा पयलीकडून गाणी यायची आणि अलीकडून दगड मुक्ताईनगर खामखेड्याचा अनोखा इतिहास !

Follow Us:

आखाजीची ती ‘गोल्डन’ परंपरा:

जेव्हा पयलीकडून गाणी यायची आणि अलीकडून दगड ;

मुक्ताईनगर खामखेड्याचा अनोखा इतिहास !

​काळाचं चक्र फिरलं आणि गावं पुनर्वसनामुळे विखुरली गेली, पण आजही मुक्ताईनगरच्या जुन्या पिढीतील काळजात ‘आखाजी’च्या आठवणींचा तोच ओलावा कायम आहे. १९६० ते १९७५ चा तो सुवर्णकाळ… जेव्हा अक्षय तृतीया म्हणजे केवळ सण नव्हता, तर तो पाच दिवसांचा एक लोकोत्सव असायचा. याबद्दल  जुन्या आठवणींना उजाळा दिलाय श्री.सुपडू भिकनराव मराठे यांनी..

​१. ‘धान’ची पेरणी आणि चैत्राचं ऊन

​सणाची सुरुवात व्हायची ती अक्षय तृतीयेला. मुक्ताईनगरमध्ये एक रीत होती—टोपलीमध्ये माती आणि गहू टाकून ते पाच दिवस भिजवले जायचे. त्याला ‘धान’ म्हणत. पाच दिवसांनी त्या गव्हाला अंकुर फुटायचे आणि सणाचा उत्साह बहरायचा. गावातल्या निंब, चिंच आणि पिंपळाच्या मोठ्या झाडांना लांबच लांब दोर बांधून झोके (पाळणे) तयार केले जायचे. तप्त उन्हाची तमा न बाळगता अबालवृद्ध झोक्यावर असायचे व खेळाचा आनंद घ्यायचे.

हवेत गाणी घुमायची:

“गौराई लेकी ओ, चैत वैशाखाचं ऊन… खडक तपून झाले लाल, गौर काय झोपूनी धम्माल!”

​२. पूर्णा माईच्या काठावरची ती ‘जुगलबंदी’

​सणाच्या पाचव्या दिवशी खऱ्या अर्थाने रंगत चढायची. डोक्यावर ‘धान’ची टोपली आणि हातात कलश (घागरी) घेऊन मुक्ताईनगरच्या महिला वाजतगाजत पूर्णा नदीच्या काठावर विसर्जनासाठी निघायच्या. ​पण खरी गंमत असायची ती नदीच्या पात्रात!
नदीच्या एका काठावर मुक्ताईनगरच्या महिला असायच्या, तर दुसऱ्या काठावर ‘खामखेडा’ गावच्या महिला. दोन्ही गावं आमनेसामने आली की सुरू व्हायचा एक अनोखा खेळ—शब्दांची आणि दगडांची जुगलबंदी!

खडाजंगी:

दोन्हीकडच्या महिला एकमेकींना ‘दुणे-दुपटीने’ बोलायच्या, टोमणे मारणारी गाणी गायच्या.

दगडफेक परंपरा:

केवळ शब्दच नाही, तर या टोमण्यांसोबतच एकमेकींच्या अंगावर दगडही फेकले जायचे! नदीचे पात्र मोठे असल्याने ते दगड एकमेकींना न लागता पाण्यात पडायचे, पण त्यातून जो उत्साह आणि जिव्हाळा व्यक्त व्हायचा, तो आजच्या पिढीला थक्क करणारा आहे.

​३. विसर्जन आणि काळाचा पडदा

​शेवटी गाणी म्हणत, हसत-खिदळत गौराईची पूजा व्हायची आणि ते ‘धान’ पूर्णा माईच्या नदी पात्रात अर्पण  करून विसर्जन केले जायचे. ही केवळ दगडफेक नव्हती, तर दोन गावांतला एक हक्काचा आणि आपुलकीचा  संवाद होता.

परंपरा का खंडित झाली?

कालांतराने हतनूर  धरणाच्या कामामुळे आणि पुनर्वसनामुळे ही गावं एकमेकांपासून दुरावली. नदीकाठची ती जवळकी संपली आणि त्यासोबतच ही आगळीवेगळी परंपराही इतिहासाच्या पानात जमा झाली. आज गावं बदलली, माणसं बदलली, पण पूर्णा नदीच्या पात्रात आजही त्या जुन्या गाण्यांचे आणि दगडांच्या ‘टप्प’ आवाजाचे प्रतिध्वनी जुन्या जाणकारांना ऐकू येतात.
​जुने दिवस, जुन्या आठवणी… आजही “अक्षय” आहेत!

Join WhatsApp

Join Now

Subcribe Youtube

Subcribe Now

पुढे वाचा

Leave a Comment

error: Content is protected !!