मुक्ताईनगरमध्ये पाणीटंचाईचे सावट; पाणी जपून वापरा
पाणीपुरवठा सभापती सविता भलभले यांचं आवाहन
मुक्ताईनगर शहरात सध्या तापमानाचा पारा ४५ ते ४६ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचला असून, वाढत्या उष्णतेमुळे शहरावर पाणीटंचाईचे संकट ओढावले आहे. या पार्श्वभूमीवर मुक्ताईनगर नगरपंचायतीच्या वतीने तसेच पाणीपुरवठा सभापती सविता सुभाष भलभले यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे नागरिकांना पाण्याचा अत्यंत काटकसरीने वापर करण्याचे जाहीर आवाहन करण्यात आले आहे.
दिलेल्या प्रसिद्धी पत्रकाद्वारे मिळालेल्या माहितीनुसार, कडक उन्हामुळे पूर्णा नदीच्या पात्रातील पाणी झपाट्याने कमी होत आहे. बाष्पीभवनामुळे दररोज सरासरी ०.३३ दशलक्ष घनमीटर पाणी कमी होत असून, शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या विहिरींनी देखील तळ गाठला आहे. भविष्यात तीव्र पाणीटंचाई निर्माण होऊ नये, यासाठी प्रशासनाने आतापासूनच खबरदारी घेण्यास सुरुवात केली आहे.
नगरपंचायतीने नागरिकांना केलेल्या सूचना:
पाण्याचा वापर अत्यंत काळजीपूर्वक करावा.
पाणी भरून झाल्यावर नळाची तोटी तत्काळ बंद करावी.
वाहने धुण्यासाठी किंवा रस्ते ओले करण्यासाठी पिण्याच्या पाण्याचा अपव्यय टाळावा.
पाणीपुरवठा सभापती सवितासुभाष भलभले यांनी स्पष्ट केले आहे की, पाण्याचा अपव्यय करताना कोणी आढळल्यास त्यांच्यावर नियमानुसार कडक कारवाई करण्यात येईल. आगामी काळात पाणीटंचाईची तीव्रता वाढू नये, यासाठी सर्व नागरिकांनी नगरपंचायत प्रशासनास सहकार्य करावे, अशी विनंतीही त्यांनी केली आहे.






